भाजपाची राज्यस्तरीय संवाद यात्रा
भाजपाची राज्यस्तरीय संवाद यात्रा
चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
२१ तारखेला पुण्यात पाच हजार पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन
मविआचे सरकार आल्यास जनहिताच्या योजना बंद होणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी १९ नेत्यांच्या नेतृत्त्वातील संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील कानाकोपऱ्यात पोहचणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. येत्या २१ जुलै रोजी पुणे येथे महाराष्ट्रातील पाच हजार भाजपा पदाधिकाऱ्यांचे अधिवेशन होणार असून त्यात भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री अमित शाह, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संवाद यात्रेविषयी अंतिम रूपरेषा तसेच तारीख पक्की ठरणार आहे.
ते कोराडी (नागपूर) येथे वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. पुण्यात होणाऱ्या अधिवेशनात अमित शाह, नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातील सर्व केंद्रीय राज्यमंत्री तसेच प्रदेशातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संवाद यात्रा
महाराष्ट्रातील भाजपाचे १९ वरिष्ठ नेते संवाद यात्रेत सहभागी होतील. ही यात्रा सर्व ४८ लोकसभा, सर्व विधानसभा तसेच जिल्हा परिषद व पचायत समिती गट आणि नगर पालिका क्षेत्रात पोहचेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये घोषित केलेली कामे व महायुती सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या कामाची माहिती, सरकारने घेतलेले निर्णय जनसामान्यांपर्यंत पोहचविणार आहोत. समाजातील सर्व घटकांना केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या संवाद यात्रेचा समारोप विधानसभानिहाय होणार आहे.
संघटनात्मक बैठक
21 जुलैच्या पुणे अधिवेशनापूर्वी 19 तारखेला मुंबईत संघटनात्मक बैठक होणार असून महाराष्ट्र विधानसभा पक्ष प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव ही बैठक घेणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
विरोधकांची भूमिका निंदनीय
आरक्षण विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलाविलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी बहिष्कार टाकून योग्य केले नाही. मराठा आणि ओबीसी समाजाच्या हितासाठी ही बैठक होती. विरोधकांची भूमिका निंदनीय आहे. अशी भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. विरोधक जातीपातीचा राजकारण करत आहे हे जनतेला दिसले. चुकून महाराष्ट्रात मविआ सरकार आले तर लोकांच्या लाभाच्या योजना बंद होतील. महाराष्ट्रातील जनतेला डबल इंजिन सरकार हवे आहे.
……………