विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार:कदम
सातारा जिल्ह्यात ५२८६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार:
भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम
विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना तेरा ते चौदा विशेष अधिकार मिळणार, तेहतीस टक्के महिलांची नियुक्ती करणार असल्याबद्दल भा ज पा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष आभार मानले
महाराष्ट्रात आता प्रत्येक पाचशे मतदारांमागे एक कार्यकारी अधिकारी राहणार असून, याप्रमाणे राज्यभरात सुमारे एक लाख ९४ हजार विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्त होणार असून सातारा जिल्ह्यात ५२८६ विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून त्यामध्ये ३३% महिलांना प्रतिनिधित्व देणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी दिली
विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियुक्तीसाठी काही निकष ठरवण्यात आले असून विशेष कार्यकारी अधिकारी राज्य निवड समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलेली आहे
महाराष्ट्र सरकारने विशेष कार्यकारी अधिकारी नियुक्ती संदर्भातील सुधारित शासन आदेश जारी केला. त्यानुसार राज्य स्तरावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा पातळीवर पालकमंत्री सदस्य व जिल्हाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी सांगितले की ,हे विशेष कार्यकारी अधिकारी शोभेचे पद असणार नाही. तर त्यांना १३ ते १४ विशेष अधिकार देण्यात येणार आहेत. आतापर्यंत प्रत्येक १००० मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी असायचा मात्र आता राज्य सरकारने नव जीआर काढून प्रत्येक ५०० मतदारांमागे एक विशेष कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतल्याने मोठ्या संख्येने विशेष कार्यकारी अधिकारी राज्यात नेमले जाणार आहेत,लवकरच सातारा जिल्ह्यातल्या निवड समितीच्या माध्यमातून नव्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांची निवड व नेमणूक केली जाणार आहे
अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये, विकासाच्या विषयांमध्ये, दक्षता समितीमध्ये विशेष कार्यकारी अधिकारी काम करणार असून, विशेष कार्यकारी अधिकारी शासनाच्या विविध योजनांमध्ये सहकारी म्हणून काम करणार आहे. प्रशासन आणि पोलिसांशी समन्वय साधणार आहे. या पदावरील नियुक्तीसाठी किमान दहावी उत्तीर्ण असावे लागेल.वय २५ वर्षांपेक्षा जास्त आणि ६५ पेक्षा कमी असावे.असा निकष ठेवण्यात आला आहे
शासकीय योजनांसाठी जे काही प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र देण्याचा अधिकार या विशेष कार्यकारी अधिकारी यांना असेल तसेच विविध समित्यांमध्ये त्यांना स्थान मिळेल.सरकारच्या विविध कामांवर लक्ष घालण्याचे अधिकार त्यांना असेल. अशी माहिती ही भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम यांनी दिली
या बाबतचा सुधारित निर्णय सरकारने केला असून, आता सरकारी सेवा व सुविधांसाठी लागणारी कागदपत्रे सुलभपणे मिळतील. जेणेकरून सरकार आपल्या दारी असल्याचे दिसून येईल. विशेष कार्यकारी अधिकारी नेमताना महिला वर्गाला महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले आहे. ३३ टक्के महिलांची नियुक्ती करण्यात येईल. तसेच राज्य सरकारच्या महत्वाच्या पाच पुरस्कार विजेत्यांनाही या पदावर नेमले जाणार आहे. या पदावरील व्यक्तीचा कालावधी पाच वर्षांचा असेल. तसेच ग्रामसभेत या अधिकाऱ्यांना विशेष निमंत्रित केले जाईल. विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना एक विशेष ओळख मिळवून दिल्याबद्दलही मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष आभार मानले
भारतीय जनता पार्टीच्या ज्या पदाधिकाऱ्यांना विशेष कार्यकारी अधिकारी व्हायचे असेल त्यांनी स्वतःच्या रेफरल कोडवर १०० सदस्य भारतीय जनता पार्टीचे करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः सक्रिय सदस्य होणे आवश्यक आहे तरच त्यांना या विशेष कार्यकारी अधिकारी होता येईल ,त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सदस्य वाढवण्याकडे, तसेच प्रत्येक बूथ मध्ये कमीत कमी पाच सक्रिय सदस्य करण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम यांनी केले आहे